E20 Petrol Effects: देशभरात E20 पेट्रोल लागू झाल्यानंतर वाहनचालकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार E20 पेट्रोलला सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि देशाच्या
ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल मानत असले तरी अनेक वाहनधारक मायलेज, इंजिनची कार्यक्षमता आणि जुन्या वाहनांच्या टिकाऊपणाबाबत चिंता व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत E20 पेट्रोल नेमके काय आहे, त्याचा वाहनांवर काय परिणाम होतो आणि सरकार याला इतके महत्त्व का देत आहे, हे जाणून घेऊया.
E20 पेट्रोल म्हणजे काय?
E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण. भारतात आता बहुतांश पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या नियमित पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळलेले असते. विशेष म्हणजे, सरकारने 2030 पर्यंतचे E20 मिश्रणाचे लक्ष्य पाच वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
सरकारच्या मते, या निर्णयामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि ऊस तसेच धान्य उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल.
E20 Fuel: नव्या E20 पेट्रोलमुळे कार-बाईकचे मायलेज खरोखरच घटते? तज्ज्ञ म्हणतात...
E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होते का?
वाहनधारकांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मायलेज.
वाहन उत्पादक कंपन्यांच्या मते, इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असल्याने E20 पेट्रोल वापरल्यास मायलेज सुमारे 3 ते 4 टक्क्यांनी कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, पूर्वी एखादी कार 20 किमी प्रति लिटर मायलेज देत असेल, तर E20 नंतर ते सुमारे 19.2 ते 19.4 किमी प्रति लिटरपर्यंत येऊ शकते.
मात्र, अनेक वाहनधारकांचा दावा आहे की प्रत्यक्षात मायलेज यापेक्षाही अधिक कमी होत आहे. त्यात पेट्रोलच्या किमतीत कोणतीही घट नसल्याने खर्च वाढल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे.
जुन्या वाहनांवर काय परिणाम होऊ शकतो?
एप्रिल 2023 पूर्वी तयार झालेल्या अनेक वाहनांची रचना E20 इंधन लक्षात घेऊन करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे काही बाबींमध्ये अतिरिक्त काळजी घेण्याची गरज भासू शकते.
विशेषत:
- फ्यूल सिस्टममधील रबर पाइप, गॅस्केट, सील आणि O-Ring यांसारख्या भागांवर दीर्घकाळात परिणाम होऊ शकतो.
- काही वाहनांमध्ये सुटे भाग अपेक्षेपेक्षा लवकर बदलावे लागू शकतात.
- थंड वातावरणात वाहन सुरू होण्यास अडचण येण्याची शक्यता असल्याची काही अभ्यासांमध्ये नोंद आहे, मात्र वाहन उत्पादक कंपन्या हा दावा मान्य करत नाहीत.
इंजिन खराब होण्यामागे E20 कारणीभूत आहे का?
अलीकडे काही वाहनांमध्ये इंजिन बिघाडाच्या घटना समोर आल्या असल्या तरी वाहन उत्पादक कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होत असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.
कंपन्यांच्या मते, काही घटनांमध्ये निकृष्ट किंवा भेसळयुक्त इंधनामुळे समस्या निर्माण झाल्या असू शकतात. त्यामुळे अधिकृत आणि विश्वासार्ह पेट्रोल पंपावरूनच इंधन भरण्याचा सल्ला दिला जातो.
इंधन खर्चात होणार बचत, बाजारात येणार नवे Petrol
वाहन कंपन्यांचा दावा काय?
मारुती सुझुकी, टोयोटा, ह्युंदाई, हिरो मोटोकॉर्प, TVS आणि बजाज यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी ग्राहकांना आश्वस्त केले आहे की E20 इंधनामुळे घाबरण्याचे कारण नाही.
मारुती सुझुकीने सांगितले की, FY26 दरम्यान 2.84 कोटींपेक्षा अधिक वाहनांची सर्व्हिस करण्यात आली. त्यापैकी 1.5 कोटींपेक्षा अधिक वाहने तीन वर्षांहून जुनी होती. या डेटामध्ये E20 मुळे इंजिन खराब होणे किंवा गंज लागल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत.
पुढे E25 आणि E30 पेट्रोल येणार?
सरकारने E22, E25 आणि E30 मिश्रणासाठीही धोरणात्मक तयारी सुरू केली आहे. मात्र, वाहन कंपन्यांचे म्हणणे आहे की E25 किंवा त्यापेक्षा जास्त इथेनॉल मिश्रणासाठी इंजिनची नव्याने रचना करावी लागू शकते, ज्यामुळे वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
E85 आणि E100 कोणासाठी?
सरकार E85 (85% इथेनॉल) आणि E100 (100% इथेनॉल) इंधनालाही प्रोत्साहन देत आहे. मात्र, हे इंधन फक्त Flex-Fuel वाहनांसाठी आहे. सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये हे इंधन वापरल्यास इंजिनचे गंभीर नुकसान होऊ शकते.
सरकारचा उद्देश काय?
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यामागे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. भारताची कच्च्या तेलावरील आयात कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे, वायू प्रदूषण कमी करणे आणि ऊस व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हे या धोरणामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे E20 नंतर भविष्यात इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे.













