Maharashtra Rain Weather News: संपूर्ण मुंबईसह उपनगरात पावसाचा चांगलाच जोर आहे. दक्षिण मुंबई,अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर,
नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पालघर सगळीकडे रात्रभर पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा जोर कायम (Maharashtra Rain Updates) राहणार आहे. पश्चिमेकडून वाहणारे वाऱ्यांचा जोर आणि तीव्रता अधिक झाल्यामुळे राज्यातील संपूर्ण भागांमध्ये सध्या पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते आहे. पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे. पुढील 48 तासानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. (Maharashtra Weather Updates)
मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे. सध्या पावसाची संततधार असली तरी पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या वतीने शुक्रवार पर्यंत पावसाचा जोर कायम राहील असं म्हंटलं आहे. मुंबईतही पावसाने जोर धरला आहे. मुंबईत 90 मिमी तर उपनगरात 129.9 मिमी सरासरी पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे 31.6 मिमी आणि सांताक्रूझ येथे 48.4 मिमी पाऊस झाला. यंदा आतापर्यंत कुलाबा येथे 1473.3 मिमी तर सांताक्रूझ येथे 1787.3 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या वेगामुळे राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाट भागात पुढील 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Rain News)
पावसामुळे पालघर, डहाणुमध्ये जनजीवन विस्कळीत- (Palghar Dahanu Rain News)
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल दुपारनंतर पावसाने जोर पकडल्यावर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीला अक्षरशः मुसळधार पावसाने झोडपून काढलं तर डहाणू आणि तलासरी तालुक्यात ठीक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. डहाणू शहराला चारही बाजूने पाण्याने वेढा घातला होता. त्यामुळे इराणी रोड परिसर चंद्रिका हॉटेल परिसर आणि सागर लॉज परिसर त्याचप्रमाणे डहाणू बस डेपो मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं येथील दुकानांमध्ये सुद्धा पाणी गेल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दुसरीकडे तलासरी आणि कासा भागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आजही पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
लोणावळ्यात पावसाची दमदार बॅटिंग- (Lonavala Rain News)
पर्यटननगरी लोणावळ्यात पावसाची दमदार बॅटिंग कायम असून अवघ्या एका दिवसात 138 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर 1 जूनपासून आजपर्यंत तब्बल 3068 मिमी पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत 3047 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धबधबे ओसंडून वाहत असून निसर्ग बहरला असला, तरी नागरिक आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसामुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा रस्ता बंद- (Gujarat Rain Marathi News)
महाराष्ट्र शेजारील गुजरातमधील वलसाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी चार चाकी वाहन पुरामध्ये अडकल्याची माहिती असून ठीक ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रहदारीचे रस्तेही बंद झाले आहेत. जिल्ह्यातील वलसाड धरमपूर कपराडा भागामध्ये मुसळधार पाऊस सातत्याने पडत असून जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली. तर वलसाडमधील पावसामुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा रस्ता बंद झाला आहे.
परभणीत सकाळपासून पासून रिमझिम पाऊस- (Parbhani Rain News)
परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पिकांना या पावसाचा मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर आदी खरीप पिके कोमेजण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते.आज झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ- (Kolhapur Rain News)
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी आठ फुटाने वाढली आहे... सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 4 इंच किती असून जिल्ह्यातील 23 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू असला तरी पश्चिमेला घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 85 ते 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. सध्या राधानगरी धरण 86 टक्के भरले असून धरणांमधून 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
मुंबईतील लोकलसेवेबाबत सर्व अपडेट्स- (Mumbai Local Train Updates)
पश्चिम रेल्वे- (Western Railway Local Train)
डहाणू ते विरार लोकलसेवा पूर्णपणे बंद आहेत.
विरार-चर्चगेट लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहे. साधारण 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहेत.
मध्य रेल्वे- (Central Railway Local Train)
10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे.
हार्बर रेल्वे- (Harbour Railway Local Train)
5 ते 10 मिनिटे उशिराने सुरु आहेत.














